Sunday, 2 November 2014

दही

                                                      दही 


            मला न, दही फार आवडत. तेही घट्ट दही. भांड कितीही हिंदकळल, तरी न मोडणार! ते  पांढर्शुभ्र  दही पाहिलं कि तोंडाला पाणी सुटत , खायचा मोह होतो . पण चमचा बुडवला , कि दही मोडणार, थोड्या वेळाने , चोथा पाणी होणार, हे ठरलेलं ! पण म्हणून मी ते मोडलच नाही तर ? At the end of the day , ते आंबट होऊन जाईल . अजून काही दिवस तसच ठेवलं , तर खराब होऊन जाईल . मग उपयोग काय त्या perfectly set झालेल्या  दह्याचा ?
            मनात विचार आला , आयुष्याचही असच असत नाही का ? दह्यासारख 'set ' झालेलं आयुष्य नक्कीच आवडेल ! पण ते आयुष्य तसच set राहील तर त्यातली गोडी निघून जाईल . वायाच जाणार ते. त्यापेक्षा रोजच्या रोज , आयुष्याच नवीन दही विरजायचं . आयुष्याची गोडी चाखायला तर हवीच ! आयुष्य जगायला तर हवच ! दिवसभर ते दही वेगवेगळ्या form मध्ये अनुभवायचं ! कधी साखर घालून , तर कधी मीठ , कधी कोशिम्बिरीत , तर कधी बुंदित, तर कधी कोणत्या ग्रेव्हीत ! कधी जेवून तृप्त झाल्यावर ताक म्हणून ! मला न, ह्या ताकाचा , हव तितकं पाणी सामावून घेण्याचा गुणधर्म फार आवडतो . अर्थात , कुठचाही अतिरेक झाला तर आयुष्य पांचटच होत ! हरेक दिवसाच्या recipe ची नजाकत वाढवता आली पाहिजे. 
              मात्र एक नियम  कटाक्षाने  पाळायचा ! पूर्ण दही संपवायच्या आधी , रोज थोड विरजण , बाजूला काढून ठेवायचं  ! 'उद्याचं '  दही लावायला ! मग रात्री झोपण्यापूर्वी , दिवसभरात जगलेल्या lukewarm क्षणांनी , परत नव्यानं दही विरजायच . 
               माहित आहे , रोज हि भट्टी जमेलच असं नाही . पण नासलच समजा कधी , कडवट झालंच समजा कधी , तर नाउमेद न होता , नव्यानं सुरुवात करायची . मग त्या करता दुसऱ्या कडून विरजण मागायची वेळ आली तरी त्यात कमीपणा नसतो . 
                पण 'दही' मात्र रोजच्या रोज ताजंच लावायचं ! 

 …………निलिमा देशपांडे .   

No comments:

Post a Comment